।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


हस्ताक्षरातील अक्षर…

काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजीलेखनावर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनचअक्षरवाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. मग हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या भावभावनांचा मेळ घालण्याचे जे शास्त्र(?) आजकाल ठासून लिहिले जाते त्याविषयी शंका घ्यायला वाव आहे.

सहीवरून स्वभाव कळतो(?) म्हणतात. ज्यांना अंगठे मारणेच जमते त्यांचा स्वभाव दिलदार आहे की संकुचित? कसे ताडावे? साक्षरता अभियानामुळे तळागाळातील लोक साक्षर झाले. मात्र ते जे लिहितात त्यातील एक अक्षर तरी वाचता येईल का? अशी काही ठिकाणी परिस्थिती असतांना हस्ताक्षरावरून व्यक्तीच्या मनातील भाव, मानसिक बैठक, भावनांची आंदोलने नोंदविणे हा प्रकार कसा तकलादू कुबड्यांवर उभा केला गेलाय ते समजून येईल.

२३ जानेवारी हा  राष्ट्रीय हस्ताक्षर दिन (नॅशनल हँडरायटींग डे) आहे.   ‘सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे,’ हा सुविचार वाचता न येण्याच्या वयापासून ऐकावा लागतो. ज्यावेळी लिहायला सुरुवात होते त्यावेळी कुत्र्याचे पाय मांजराला होणे क्रमप्राप्त असते. धाकदपटशा दाखवून अक्षर सुधारते, सुधारावता येते. म्हणजे लहानग्यांनी जे ‘चितारलेय’ ते इतरांना ‘वाचण्या’योग्य होते. खरे तर वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी वळणदार हस्ताक्षर शिकणे जाणीवपूर्वक सुरु होते. त्यानंतर मात्र स्वतःची विशिष्ट ‘लिखाण’शैली विकसित होते. चोविसाव्या वर्षी हे शिकणे पूर्ण होऊन हस्ताक्षरातून स्वत्व ठीबकू लागते. हँडरायटींगला ब्रेनरायटिंग समजण्याचा काळ या वयानंतरच सुरु होतो, असे म्हणतात.
परंतु मुख्य मुद्दा इथेच उपस्थित होतो की, या वयानंतर पेन कागद घेऊन एकाग्रतेने लिहितांना आजकाल कुणी आढळते का? टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेटच्या या वेगवान जमान्यात ही ‘उत्तम हस्ताक्षर’ नामक कला एका दूर कोपऱ्यात जाऊन पडली आहे की नाही? स्क्रीनवर लागतील इतक्या संख्येने इंग्रजी-मराठी फॉन्ट उपलब्ध असतांना आणि ते विनासायास पाहिजे त्या आकारात प्रकारात प्रिंट करता येण्याची सोय असतांना कोण पठ्ठ्या कागदावर सुंदर अक्षरांचे दागिने पेरीत बसेल? आता तर म्हणे प्रत्येक शाळा संगणकीय करणार आहेत. अकरावी-बारावीच्या मुलांना स्वस्तातले लॅपटॉप मिळणार आहेत. म्हणजे उद्याची कॉलेजियन्स खिशात पेन घेऊन मिरविण्याऐवजी संगणकच ठेवून मिरवतील हे आजही दिसतेच आहे. अशावेळी सुंदर हस्ताक्षर वगैरे प्रकार फारच गौण मानला जाईल. याबाबत दुमत नसावे. ज्याचे प्रेझेंटेशन उत्तम तोच उत्तम असेही एक नवे सूत्र आमलात येईल.

सद्याच्या पिढीकडे अॅन्ड्रॉईड लोडेड मोबाईल असतांना कोण महाभाग कागदांवर वा वहीत कधी ना कधीतरी ‘संपणाऱ्या’ पेनाने नोट्स लिहीत बसेल? मग हे ‘हस्ताक्षर सुधार’ वर्ग घेणे, हस्ताक्षरावरून व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणे, अक्षरांच्या उंचीवरून- फर्राटे मारण्याच्या शैलीवरून मनातील आंदोलने समजावून घेणे याचे ‘शास्त्र’ नक्कीच कालबाह्य ठरणार हे निश्चित.

मामलेदार कचेरीत जाऊन पहा. तिथे अर्ज लिहून देणाऱ्या व्यक्तींची अक्षरे त्यांनाच कळत असतील की नाही देव जाणे. कुठल्याही सरकारी कचेरीत गेलात अन् फायली चाळल्या असता काय दिसेल? हो दिसेलच ते, वाचता येणे अशक्यच असते. शिफारस वा टिप्पणी लिहितांना वरिष्ठ साहेबच जिथे कंजुषी करतो तिथे इतर लिपिकांची सुंदर अक्षर काढण्याची काय मजाल? फार फार तर चौथी पाचवीची मुलेमुलीच तेवढी काहीतरी सुंदर लिहितांना (तेही शिक्षकांनी कम्पलसरी केलं असल्याने) दिसतील. अन्यथा सगळीकडे सुंदर हस्ताक्षरांची बोंबाबोंबच दिसते. असे असतांना आजच्या पिढीसाठी आउटडेटेड ठरणारी शैली गळी उतरविण्याचा गवगवा करून त्यासाठी रान उठवायचे काहीच कारण नाहीये.

आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. ते असे लिखाण असते की डॉक्टरपेक्षा तो केमिस्टच अतिहुशार म्हणावा की ज्याला ते औषध काय लिहिले असावे याचा अचूक ‘अंदाज’ लावता येतो. पण म्हणून काही डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरावरून ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास काढणारे शास्त्र ‘फसवे’ म्हणावे नाही तर काय? या पुष्ट्यर्थ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.

एकंदर काय तर लफ्फेदार सही ठोकणारा जितका लुच्चा असू शकतो तितका जोरकस अंगठा उठविणारा कदापी नसतोच असे नेहमी आढळून येते ते काही उगाच नाही. मग गलिच्छ हस्ताक्षरावरून एवढा गदारोळ उडविण्याचे काम का म्हणून करायचे? ज्याला जशी अक्षरे लिहायचीत तशी लिहू द्या, अक्षर चांगले‘च’ असावे असा अट्टहास का? 

– डॉ.श्रीराम दिवटे

स्रोत : कायप्पा  


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१